बेळगाव लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी पडघम वाजायला सुरुवात झालीये. बेळगावात काही दिवसांपासून दिवंगत सुरेश अंगडी यांचे वारसदार कोण, याची चर्चा सुरु आहे. श्रद्धा अंगडी-शेट्टर ही सुरेश अंगडी यांची द्वितीय कन्या आणि राज्याचे औद्योगिक मंत्री आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची सून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंगडीच्या निवासस्थानाला भेट दिली होती. यानंतर श्रद्धा राजकारणात अँक्टीव्ह झाल्या असुन त्यांनी लोकसभेची जोरात तयारी सुरू केली आहे. श्रद्धा यांनी मंगळवारी राजहंसगड गावाला भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच त्यांनी शिवभक्तांचा जिव्हाळाचा असलेला विषय आणि गेल्या काही दिवसांपासून बेळगावात चर्चेचा विषय बनलेल्या ऐतिहासिक राजहंसगड किल्ल्याला भेट दिली आणि सिद्धेश्वर मंदिरात पूजा केली.
भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बेळगावचे दिवंगत सुरेश अंगडी यांची मुलगी श्रद्धा अंगडी-शेट्टर निवडणूक लढवणार का...? अशी चर्चा आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही उमेदवारी देण्याची मागणीही भाजपाच्या एका गटाकडून होत आहे. तसेच अन्य इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे.
श्रद्धा ह्या पहिल्यांदाच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर होत्या. त्यामुळे त्याही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. आता 2021 च्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रद्धा अंगडी-शेट्टर यांचं नाव पुढे आल तर...? त्यामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत श्रद्धा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर श्रद्धा दिसून आल्या. या कार्यक्रमात अधिकृतरित्या भाजपमध्ये एंट्री घेतल्याचे श्रद्धा यांनी स्पष्ट केले आहे. सुरेश अंगडी यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अंगडी समर्थकांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यालाच द्यावी, अशी मागणी केली.
बंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये शनिवारी (16 जानेवारी) झालेल्या भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावर हल्ला करणाऱ्या कोणत्याही आमदारांची नावे घेतली नाहीत. मात्र मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यासाठी माध्यमांकडे जाणाऱ्या असंतुष्ट आमदारांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला. कर्नाटक राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपा पक्षात निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे सरसावले आहेत. पक्षाला धक्का पोचविणारे वक्तव्य केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा शहा यांनी दिला. शहा यांनी, आमदारांनी कोणत्याही बेशिस्त कृतीत अडकू नये. सर्वांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही केले.