देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत(Corona Cases in India) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशात आता मंगळवारचे (21 एप्रिल) आकडे (Corona Update) चिंतेत आणखीच भर घालणारे आहेत. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर मृतांच्या आकड्यानंही उच्चांक गाठला आहे. मंगळवारी 24 तासात तब्बल 2 लाख 94 हजार 115 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, वर्ल्डोमीटरनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत देशात 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे. पहिल्यांदाच देशात 2 हजारहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. मागील सलग पाच दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात भलतीच वाढ नोंदवली जात आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 1,82,570 इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 1,56,09,004 झाली आहे. देशात सध्या 21,50,119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे रुग्ण देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या 13.8 टक्के आहेत.
कोरोनाबाधितांची बरं होण्याचा दर घटून 85 टक्क्यांवर आला आहे. देशपातळीवर कोरोनाच्या मृत्यूदरात घट होऊन तो 1.20 टक्के झाला आहे. तर, महाराष्ट्रात मात्र हा दर 1.5 आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के इतका आहे. देशात मागील 24 तासात सर्वाधिक 519 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये 277, छत्तीसगड 191, उत्तरप्रदेश 162, गुजरात 121, कर्नाटक 149, पंजाब 60 , मध्य प्रदेश 77 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच जवळपास 1556 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण 2020 मृतांपैकी 77.02 टक्के आहे. मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 62,097 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 29574, दिल्लीमध्ये 28395, कर्नाटक 21794, केरळ 19577 आणि छत्तीसगडमध्ये 15625 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.