बेळगाव : कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरवासीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे आता गावात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या गावात पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे मंगळवारी महाराष्ट्राने लाॅकडाऊन तर कर्नाटक सरकारने नाईट व विकेंड कर्फ्यू लावल्याने जिल्ह्यातील सीमाही बंद होत आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन होत आहे.
बुधवारपासून निपाणी पोलिसांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद केल्या असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग-4वर कोगनोळी टोल नाका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. NH4 कोगनोळी टोल नाका येथे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. निपाणी भागामधील पोलिसांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यामध्ये आप्पाचीवाडी-म्हाकवे, बेनाडी-सुळकुड, मांगुर-यळगुड, निपाणी-मुरगुड या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी निपाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शिवाय रहदारीचे प्रमुख रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या निपाणी आणि कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट सुरु झाला आहे. तपासणी करुनचं महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
सांगली जिल्हा लगतच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून कागवाड तालुक्यातील लोकूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. गावाच्या सीमा माती, झाड, फांद्या, काट्या टाकून अनेक खेडेगाव व इतर गावांतील रस्ते बंद करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी (महाराष्ट्र) लागू झाल्यावर लोकांनी आपापल्या गावात बाहेरची लोक येऊ नयेत म्हणून गावाच्या वेशीवर मुख्य रस्तेच दगड काट्या टाकून बंद करायला सुरुवात केली आहे.