बेळगाव ता. खानापूर : खानापूर तालुक्याच्या भीमगड अरण्य व्याप्तीच्या दुर्गम भागातील अबनाळी गावातील 144 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रशासनबरोबरच या गावकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीने युवा समिती आणि Facebook Friend Circle च्या टीमने जीवनोपयोगी साहित्याचे गावात वितरण केले. काही दिवसांपूर्वी या गावात सर्दी, पडसे, ताप, जुलाबाची साथ आली होती. त्यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने अबनाळीला भेट देऊन सर्वांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे दिली. त्यावेळी गावातील एकूण 240 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 144 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.
कोरोना लागण झालेले सर्व गावकरी आरामात आहेत आणि कोरोनाची तीव्रता तितकी नसली तरी खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने संपूर्ण गाव बंद केले. तसेच रुग्णांवर गावातच उपचार सुरू ठेवत त्याठिकाणी संचारबंदी केली. परिणामी गावात जीवनोपयोगी साहित्याचा तुटवडा भासू लागला. याची दखल घेत बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कल आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या प्रमुखांनी गावाला 2 टन भाजीपाला आणि तेल, डाळ, साखर, कांदे इत्यादी साहित्य असलेली 100 कीट मदत म्हणून ग्रामस्थ आणि ग्रा. पं. प्रशासनाकडे सुपूर्द केली.
मार्केट यार्ड बेळगाव येथील राजू काकती, विजय काकती, हेमंत पाटील, नकुल तुमरी, विश्वास तुमारी, महेश सचदेव यांनी भाजीपाला मदतीचा हात पुढे केला. गावकऱ्यांच्या मदतीसाठी दानशूर वेक्तींनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन यावेळी युवा समितीच्या धनंजय पाटील यांनी केले. आरोग्याच्या प्रगत सुविधा तालुक्यात नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांची हेळसांड होते. त्याकरिता लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे सामूहिक प्रयत्न हवेत, असे प्रतिपादन यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कल चे अध्यक्ष संतोष दरेकर यांनी केले.
YouTube Video पाहाWatch YouTube Video
यावेळी युवा समितीचे उपाध्यक्ष पिंटू नावलकर, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सदस्य अमित परमेकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी, सहदेव हेब्बाळकर, माधुरी जाधव, सदानंद मासेकर, सोमनाथ पाटील, राहुल सावंत तसेच तालुका आरोग्यधिकारी संजीव नंद्रे , श्रीमती एम. बी. पारीश्वड, आर के पाटील आदींसह तालुक्यातील वैद्यकीय पथक उपस्थित होते.
गावातील एका जुन्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरल्याने गावातील बर्याच लोकांना ताप व सांधेदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने जवळपास 250 जणांची तपासणी व त्यांच्यावर उपचार केले होते. आता ते सर्वजण या आजारातून बरेही झाले आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तब्बल 15 दिवसांनी मिळाला. त्यामध्ये 144 जण पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. गावात मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, शुद्ध पाणी पिणे तसेच दिलेली औषधे घेऊन कोरोनावर मात करण्याचा सल्ला अधिकार्यांनी गावकर्यांना दिला आहे.