बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपची पारंपरिक मराठा मते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पारड्यात गेल्याने भाजपचे मताधिक्य घटल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे बोलताना मान्य केले. यापुढे भाजपची मराठी मते विभागली जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. पोटनिवडणुकीत शेवटच्या फेरीपर्यंत प्रचंड चुरशीच्या ठरताना अखेर भाजपने आपला गड राखला. भाजपच्या मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी एकाकी झुंज देत तब्बल 1 लाख 17 हजार यावर मते मिळवली भाजप उमेदवार मंगला अंगडी या बेळगावच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या.
गेल्या चार निवडणुकीत भाजपाचे सुरेश अंगडी प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या विजयात मराठी मतांचे योगदान मोठे होते. त्यांच्या पत्नी विजयी झाल्या तरी त्यांचा हा विजय निसटता ठरला. 2004 पासूनचा विचार करता सलग चारवेळा भाजपचे स्व. सुरेश अंगडी या मतदार संघातून निवडून आले होते. त्यांचे मताधिक्य कधी 75 हजाराच्या आत आले नव्हते. 2004, 2009 आणि 2019 या तिन्हीवेळा स्व. अंगडी यांनी अनुक्रमे 83 हजार, 1 लाख 18 हजार व 3 लाख 87 हजार असे मताधिक्य घेतले होते. 2014 मध्ये मात्र त्यांना बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँटे की टक्कर देत हे मताधिक्य 75 हजारांवर आणले होते.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यावर हुबळी येथे रविवारी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, मतदारांनी कमी मतदान केले आणि मतांचे विभाजन झाल्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा विजय कमी मताधिक्याने झाला. पक्षाची पारंपारिक मराठा मते एकीकरण समितीकडे गेली. भविष्यात मराठा मतांचे विभाजन होणार नाही, याची पक्ष दक्षता घेईल. ते म्हणाले, बेळगावच्या मतदारांनी भाजपला सोडले नाही हेच या चुरशीच्या निवडणुकीतूनही दिसून आले.
हा विजय बेळगावच्या लोकांनी, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास दाखवणारा पुरावा आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी किमान 60 हजार मताधिक्याने विजयी होतील, अशी आमची अपेक्षा होती. पोटनिवडणूक ही भविष्यातील सार्वत्रिक निवडणुकांचे सूचक कधीच नसते. या निकालांचा भविष्यातील निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही. पक्षाची राज्य व देशातील निवडणुकांच्या निकालावर सविस्तर चर्चा होईल. बेळगाव मतदारसंघाच्या विकासकामांबाबत मंगला अंगडी निर्णय घेतील. केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांना माझे सर्वतोपरी सहकार्य राहील.