बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री नेमणे हे आता राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षांना धोक्याची घंटा ठरू लागले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनो, बेळगाव जिल्ह्यासाठी बाहेरचा पालकमंत्री नेमलायं. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या बेळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मंत्री गोविंद कारजोळ यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री कारजोळ मुधोळचे (जि. बागलकोट) आमदार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री असताना अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांची जिल्हा पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने जनतेत चुकीचा संदेश जात आहे. विविध योजना राबवितानाही अडचण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही एका मंत्र्यांची पालकमंत्रीपदी वर्णी लावावी, अशी मागणी माजी खासदार व बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केली आहे. ते सोमवारी संकेश्वरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री कारजोळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र, बेळगाव जिल्हा राज्यात मोठा असून त्यात 18 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री आहेत. असे असताना अन्य राज्यातील मंत्र्यांना पालकमंत्रीपद का देण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील किंवा केएमएफचे अध्यक्ष भालचंद जारकीहोळी यांच्यापैकी एकाला पालकमंत्री देणे गरजेचे होते. मात्र, मुख्यमंत्री येडियुराप्पा अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्रीपद देत असल्याने जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्रिपदासाठी योग्य नसल्याची चर्चा होत आहे. परजिल्ह्यातील मंत्र्यांना जिल्ह्यातील समस्यांची जाण नसते.
याआधी जिल्हा पालकमंत्रीपदी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची नियुक्ती झाली होती. हुबळीतील असल्याने त्यांना बेळगावसाठी अधिक वेळ देता आला नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित राहिले होते. तसेच पक्ष संघटनेला ही बाब मारक ठरत आहे. याचा परिणाम लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर झाला असून भाजप उमेदवाराच्या विजयाच्या मतांचे अंतर कमी झाले आहे, असे माजी खासदार कत्ती यांनी अधोरेखित केले.