बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम्ही हारून देखील जिंकलेले आहोत. या निवडणुकीमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सतीश जारकीहोळी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मताधिक्यात वाढ होण्यासाठी भाजप सरकार कारणीभूत असून, त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे समितीच्या मताधिक्यात वाढ झाली आहे. येथील काँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्याला गोकाक आणि बेळगाव दक्षिणमध्ये मताधिक्य कमी झाले आहे. इतर सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने चांगले मताधिक्य मिळवले आहे. गोकाकमध्ये मतदारांना झालेल्या पैसे वाटपामुळे येथे मतदान भाजपला अधिक मिळाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गोकाक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना प्रत्येकी 200 रुपयांचे वाटप हे त्यांच्या मताधिक्यात वाढ होण्यासाठी मदत ठरले. काँग्रेस हा मार्ग कधीही अवलंबत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत समितीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपची पारंपरिक मराठा मते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पारड्यात गेल्याने भाजपचे मताधिक्य घटले. यावेळी मराठी भाषक भक्कमपणे समितीच्या पाठीशी उभे राहिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. समितीच्या मतांमुळेच भाजपचे मताधिक्य 4 लाखाहून अवघ्या 5 हजारांवर आले आहे. मणगुत्ती आणि पिरनवाडी प्रकरण तसेच कन्नड संघटनांकडून मराठी भाषकांना सातत्याने डिवचले जात असतानाही भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत आवाज उठविला नाही. तसेच महापालिकेसमोर लावलेला अनधिकृत लाल पिवळा ध्वज हटविण्याबाबतही भूमिका घेतली नाही. त्यामुळे, मराठी भाषकात राष्ट्रीय पक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेरीस मराठी भाषकांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.