सांगली : अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याच्या वादासह पूर्ववैमनस्यातून सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथे दोन गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून तलवार, चाकू, सत्तूर अशा धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने या वादात तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दुधोंडी येथील वसंत नगर परिसरात घडली. एकाच वेळी तिघांचा खून झाल्याने जिल्हा हादरला आहे. दुधोंडीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुंडल पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दुधोंडी येथे रविवारी दुपारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत होती. यावेळी वसंत नगर येथील साठे आणि मोहिते गटात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून तलवार, सत्तूर, चाकूचा वापर झाल्याने मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद बाबुराव साठे (वय 60), सनी आत्माराम मोहिते (40), विकास आत्माराम मोहिते (36) अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. छाती आणि पोटावर धारदार शास्त्रांचे घाव लागल्याने अतिरक्तस्रावाने या तिघांचाही मृत्यू झाला.
सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दोन गटातील राड्यानंतर परिसरात जोरदार दगडफेकही झाली आहे. या दगडफेकीत काही वाहनांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, तिहेरी खुनाची घटना समजताच कुंडल पोलिस दुधोंडीत दाखल झाले. पोलिस येण्यापूर्वीच दोन्ही गटातील हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेत स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेनंतर दुधोंडीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
याबाबत कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटातील हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच वेळी तिघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडीराम मोहिते या संशयित आरोपींवर कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दोन्ही गटातील हल्लेखोर व मृत हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता. रविवारी दुपारी तो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आला. त्यातून ही घटना घडल्याचे समजते.