बेळगाव : पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (एनएच-4 NH4) या रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. त्याबाबत नोटिफिकेशन देण्यात आले होते. महाराष्ट्रापर्यंत जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (NH-4) रस्त्याचे आता पुन्हा रुंदीकरण होणार असून हा रस्ता 6 पदरी होणार आहे. शेतकर्यांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता बेळगाव तालुक्यातील बेन्नाळी येथून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सर्व्हे करण्यास सुरुवात केली. सध्या बेन्नाळीपासून सीमेवरील कोगनोळीपर्यंत (ता. निपाणी) हा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आणि मालमत्ताधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन आणि मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या होत्या. बेन्नाळी येथील लुमाण्णा जोतिबा टक्केकर, तुकाराम लक्ष्मण पाटील, अशोक नारायण पाटील यांच्यासह इतर शेतकर्यांच्या जमिनींचा सर्व्हे केला. काही ठिकाणी 25 ते 40 फुटांपर्यंत जमीन गेली आहे, तर काही ठिकाणी 10 ते 20 फूट जमीन गेली आहे. बेन्नाळीपासून सीमेवरील कोगनोळीपर्यंत (ता. निपाणी) हा सर्व्हे होणार आहे. टप्प्याटप्प्याने आता या सर्व्हेला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे 20 वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले होते. त्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, अलीकडे वाहनांची संख्या वाढत गेल्यामुळे रस्त्याचे पुन्हा रुंदीकरण वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला. आता हा रस्ता सहा पदरी होणार आहे. त्यामुळे होनग्यापासून महाराष्ट्राला जोडलेल्या कोगनोळीपर्यंतच्या सर्व्हे क्रमांकाचे नोटिफिकेशन काढण्यात आले. त्यामुळे पुन्हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकर्यांना मोठा फटका बसणार आहे.
बेळगाव तालुक्यामध्ये येणार्या बंबरगे, बरमनट्टी, भुतरामहट्टी, हलभावी, होनगा, सुतगट्टी या गावांतील जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जमिनी जाणार असल्याने ते भूमिहीन होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील 515.000 कि.मी. ते 592.705 कि.मी. पर्यंतच्या रस्त्यासाठी हे नोटिफिकेशन काढले आहे. होनगा ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या एकूण 77.704 कि.मी. पर्यंतच्या सर्व्हे क्रमांकामधील ही जमीन घेतली जाणार आहे, असे या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
नोटिफिकेशन काढल्यानंतर तातडीने हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, बेळगाव ते कोल्हापूरपर्यंत मराठी भाषिकांच्याच जमिनी असल्यामुळे त्यांना या नोटिफिकेशनबाबत कोणतीच माहिती नव्हती. आता शेतकर्यांना नोटिसा पाठवून थ्रीडी झाल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी चौपदरीकरणामध्ये शेतकर्यांची हजारो एकर जमीन गेली. आता पुन्हा हजारो एकर जमीन जाणार आहे. रस्त्याला लागून अनेकांनी धाबा, हॉटेल्स, पेट्रोल पंप, इतर व्यवसाय थाटले आहेत. त्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. याबाबत शेतकरी तसेच विविध आस्थापनांचे मालक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अत्यंत गुप्तपणे या जमिनी घेण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार याची कल्पना काही जणांना होती. मात्र, इतक्या लवकर या रस्त्याचे सहा पदरीकरण होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. अचानकपणे एका इंग्रजी आणि कन्नड वृत्तपत्राला नोटिफिकेशन देऊन शेतकर्यांना नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे आता शेतकर्यांना न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काही जणांनी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील केलीयं.