बेळगाव ता. खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला. परशराम जयराम पाटील (वय 28) गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्याचा दोन दिवस झाले तरी पत्ता लागला नाही. म्हणून घरच्यांनी शोधाशोध करून पाहिले. परंतु कुठेच शोध लागला नाही.
खानापूर पोलिस स्थानकात 1 सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविण्यात आली होती. करंबळ गावापासून काही अंतरावर असलेल्या कुप्पटगिरी गावाजवळच्या मलप्रभा नदीत तरूणाचा मृतदेह तंरगताना नागरिकांना दिसला. लागलीच खानापूर पोलिसांना हे वृत्त कळविण्यात आले. पोलिसानी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. परंतु मृ़तदेह पूर्णपणे सडलेला होता. त्यामुळे ओळख पटणे कठीण होते. यासाठी परशराम पाटील याच्या घरी कळविण्यात आले. शेवटी कपड्यावरून परशरामचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्याच्या अकस्मात निधनाने शोककळा पसरली आहे.