बेळगाव : कपिलेश्वर तलावावर गणपती विसर्जनाच्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील तेही लाल-पिवळ्या रंगात फलक लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळाचे गालबोट बेळगावच्या गणेश विसर्जन कार्यक्रमाला लागले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन फलक इतर भाषेत का लावला नाही? असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्यासमोर उपस्थित केला. नजरचुकीने असे झाले असून यापुढे होणार नाही, असे त्यांनी सांगितले; मात्र काही कार्यकर्त्यांनी उद्धट उत्तर दिल्यामुळे त्या संतापल्या होत्या. आणि त्यांनी थेट एसीपींना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
एसीपी एन. व्ही. बरमनी व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पागवण्याचा प्रयत्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात शेवटचे विसर्जन आज सकाळी 6 वाजेपर्यंत झाले. बेळगाव महापालिकेचा गणपती सकाळी सहा वाजता विसर्जन होताच गणेश उत्सवाची सांगता झाली. रात्रभर अनेक ठिकाणी तुरळक लाठी हल्ला झाला होता.