बेळगाव : एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना आता धामणे (एस) परिसरात हत्तींचा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी हत्तींनी ट्रॅक्टर अन् बैलगाडी पलटी केलायं. दरवर्षी तिलारी परिसरातून धामणे व चंदगडातील काही गावात हत्तींचा उपद्रव होत असतो. गेल्या सहा दिवसांपासून धामणे परिसरात तीन हत्तींचा वावर असून भात पिकांसह उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे.
याच दरम्यान हत्तींना माघारी धाडण्यासाठी ग्रामस्थांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत; पण त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे वनविभागाने हत्तींना या परिसरातून हुसकावून लावावे, शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. धामणे परिसरात हत्तींचा धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.