बेळगाव : आनंदवाडी येथील घरांचा आणि जागांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वक्फ बोर्डाला न्यायालयाने दणका दिला आहे. 11 घरांचा ताबा घेण्यास न्यायालयाने स्थगिती दिली असून इतरही लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आपली जागा असल्याचे सांगून घरे व खासगी जमिनीवर ताबा दाखवण्याच्या कर्नाटक वक्फ बोर्डाच्या प्रक्रियेवर जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीशांनी स्थगिती आदेश दिला आहे. यासंदर्भात आता कोणत्याही प्रकारची हालचाल करता येणार नाही असेच न्यायालयाने सांगितले आहे.
यासंदर्भातील निर्णय योग्य ती प्रक्रिया झाल्यानंतरच आणि न्यायालयासमोर योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतरच होऊ शकणार आहे. गेल्या आठवड्यात वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील 45 घरांचा ताबा घेणार असल्याची नोटीस पाठवली होती. त्याविरोधात लोकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे ही कारवाई झाली नाही. 11 जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानुसार सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने स्थगिती आदेश बजावला आहे. वक्फ बोर्डाच्या कारवाईविरोधात इतर लोकही न्यायालयात जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.