बेळगाव - कर्नाटक : कर्नाटक विधानसभेची निवडणूक अद्याप एक वर्ष लांब आहे. मात्र त्यापुर्वीच कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपमधील एका विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांसह 25 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही भाजप नेत्याच्या या दाव्याला दुजोरा दिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते बसवन गौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या दाव्यानुसार, पुढील वर्षी कर्नाटकमधील निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपमधील विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांसोबत अनेक आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये जातील. राज्यातील नेते उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप सोडतील. या आमदारांनी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. आमच्याकडे त्याबाबत माहिती अधिकृत माहिती आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे मंत्री आणि आमदार भाजपचा राजीनामा देतील. यत्नाळ यांच्या या दाव्यानंतर कर्नाटक भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यत्नाळ यांनी हे पक्षांतर थांबवण्यासाठी उपाय देखील सांगितला आहे. ते म्हणाले, भाजप नंतर काहीही करू शकणार नाही. त्यांना आताच कृती करावी लागेल आणि मंत्रिमंडळाचा तात्काळ विस्तार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले आहे. मागच्या काही काळापासून 4 रिक्त जागांसाठी तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते करत आहेत. पण, 5 राज्यांमधील निवडणुका आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते व्यस्त आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागणार असल्याचे राज्य भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे काही भाजपचे मंत्री आणि काही आमदार नाराज आहेत.
डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांचाही दुजोराया सगळ्या घडामोडींदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही यत्नाळ यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, विद्यमान मंत्र्यांसह भाजपचे काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र गुप्तता राखणे हा राजकारणाचा भाग आहे. जे काँग्रेसमध्ये येणार आहेत त्यांची माहिती आताच उघड करणे शक्य नाही आणि मीडियाशीही या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. त्यांच्या पक्षात काय चालले आहे, हे भाजप नेत्यांना माहीत आहे. तर सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांची नावे आता उघड करणार नाहीत.