बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्ना संदर्भात महाराष्ट्र सरकारने तज्ञ समितीची नेमणूक केली होती. या कमिटीच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे प्रा. एन डी पाटील होते. मात्र प्रा. एन डी पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे त्यांच्या जागी मंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कडे केली होती.
तसेच 11 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्याशी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. यावेळी पवार यांनी लवकरच जयंत पाटील यांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच समितीच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जयंत पाटील यांची तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तज्ञ कमिटीमध्ये जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ वकील राम आपटे, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांच्यासह महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.