बेळगाव : मराठी भाषिकांचे नुकसान होऊ नये याकरिता खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्य करावे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकट करावे, अशी सूचना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. खानापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांना एकत्र करण्यासाठी काही दिवसांपासून कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. त्याबाबत शनिवारी खानापूर तालुका समितीच्या समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कॉलेज रोड येथील सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. राजाभाऊ पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी खानापूर समितीचे आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, नारायण कापोलकर आदींनी तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी हब्बनहट्टीत दोन्ही गटांची बैठक घेऊन एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला चालना दिली होती. बैठकीला विलास बेळगावकर, अर्जुन देसाई, विशाल पाटील, मुरलीधर पाटील, विवेक गिरी, बाळासाहेब शेलार, विठ्ठल गुरव, डी. एम. गुरव, डी. एम. भोसले, कृष्णा मंडोळकर, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, अविनाश पाटील, जयराम देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.