बेळगाव : खानापूर म. ए. समितीत पडलेल्या दोन गटात बुधवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने एकी झाल्याची घोषणा केली. 8 जणांची कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. या कमिटीने 27 नोव्हेंबरपर्यंत सर्व मराठी गावांमध्ये दौरा करून समिती कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक गावातून 5 कार्यकर्त्यांची नावे देण्यात यावीत, त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी पुन्हा शिवस्मारकात बैठक घेऊन कार्यकारिणी, पदाधिकारी जाहीर करण्यात येतील, असे मध्यवर्तीच्या निरीक्षक म्हणून आलेल्या पाच जणांच्या कमिटीने जाहीर केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते.
2018 च्या निवडणुकीनंतर तालुक्यात म. ए. समितीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले होते. दोन्ही गट समिती म्हणूनच कार्यरत होते. त्यामुळे तालुक्यातील मराठी भाषिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच राष्ट्रीय पक्षांनी मराठी गावांमध्ये जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली होती. समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते एकी व्हावी, अशी मागणी करत होते. यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू होते. तालुक्यातील काही युवकांनी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकार्यांची नुकतीच भेट घेऊन खानापुरात प्रत्यक्ष येवून एकीची घोषणा करावी, अशी मागणी केली होती. युवकांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे
एकीसंदर्भात विचार मांडण्याचे आवाहन केल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले व मध्यवर्ती देईल तो निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. यानंतर प्रकाश मरगाळे यांनी दोन्ही गट विसर्जित झाल्याची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, यशवंत बिरजे, धनंजय पाटील, राजू पाटील, गोपाळ देसाई, ईश्वर हेब्बाळकर व हणमंत मेलगे अशा आठ जणांची कमिटी जाहीर करण्यात आली. या कमिटीने 27 नोव्हेंबरपर्यंत तालुक्यातील मराठी गावांमध्य दौरे करून प्रत्येक गावातून पाच कार्यकर्त्यांची नावे जमा करावीत, त्यानंतर 30 नोव्हेंबरला पुन्हा मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली शिवस्मारकात बैठक बोलावून विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. जाहीर कार्यकारिणीतूनच पदाधिकारी निवडण्यात येतील. यासाठी आठ जणांनी तातडीने खानापूर तालुक्यात बैठकांचे आयोजन करावे, असेही सूचविण्यात आले.