बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. अशातच मंगळवारी बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. हिरेबागेवाडी येथील टोल नाक्याजवळ महाराष्ट्र पासिंगचे ट्रक अडवून त्यांच्या काचा फोडणाऱ्या अनोळखी जणांविरोधात हिरेबागेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दोन स्वतंत्र एफआयआर करून, एका एफआयआरमध्ये 8 ते 12 जणांवर तर दुसऱ्यामध्ये 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कन्नड संघटनेच्या नारायण गौडाच्या उपस्थितीत हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ सुमारे 350 हून अधिक कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला. ट्रकवर चढून लाल-पिवळा फडकावत समिती नेत्यांविरोधात घोषणा दिल्या होत्या.