बेळगाव : दोन महिन्यांपूर्वी सुळगा (हिं.) येथील महिलेने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत झाली होती. परंतु, आपल्या आईने आत्महत्या केली नसून खून झाल्याचे पत्र सदर महिलेच्या 18 वर्षीय मुलीने लिहिले आहे. शिवाय मृत महिलेच्या वडिलांनीही हा खून असल्याचे सांगत पुन्हा फिर्याद दिली आहे. त्यानुसार काकती पोलिसांनी मंगळवारी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. गीतांजली जोतिबा शहापूरकर (42, रा. ब्रह्मलिंग गल्ली, सुळगा) यांनी 6 जून 2020 रोजी आत्महत्या केल्याची नोंद दुसर्या दिवशी 7 रोजी काकती पोलिसांत झाली. त्यांनी क्षुल्लक कारणातून आत्महत्या केल्याची नोंद तेव्हा पोलिसांनी करून घेतली आहे. परंतु, आता तब्बल दोन महिन्यांनी या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या महिलेची 18 वर्षाची मुलगी रेणुका जोतिबा शहापूरकर हिने आपल्या आईने आत्महत्या नव्हे, तर आमच्याच घरातील लोकांनी खून केल्याचे पत्र भारतीय महिला फेडरेशनला लिहिले आहे.
शिवाय सदर महिलेचे वडील वासू यादो मायाण्णा (रा. कडोली) यांनीही मंगळवारी पोलिसांत पुन्हा फिर्याद दिली असून, त्यानुसार आधीच्या एफआयआरमध्ये आता खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये मृत महिलेचा सासरा निंगाप्पा गुंडू शहापूकर (वय 70), सासू लक्ष्मी निंगाप्पा शहापूरकर (वय 61), दीर उमेश निंगाप्पा शहापूरकर (वय 37) व जाऊ लता उमेश शहापूकर (वय 30) यांचा समावेश आहे. मुलगी रेणुकाने जे पत्र महिला फेडरेशनच्या राज्य सचिवांना लिहिले आहे, त्यामध्ये धक्कादायक माहिती आहे. माझ्या आईने आत्महत्या केली नसून घरातील लोकांनी तिचा खून केला आहे, असे तिने म्हटले आहे.
आई गेली तेव्हा आम्ही दुःखात होतो. आम्हाला तेव्हा पोलिसांना सांगायचं होतं. परंतु, त्यावेळी गावातील पंच काही सांगू नका, असे सांगत होता. तेव्हा जीवाला धोका होईल म्हणून काही बोललो नाही. जेव्हा आम्ही 14 दिवसांनी मामाच्या गावी कडोलीला गेलो तेव्हा आमची भीती गेली. जे काही घडलं ते आधी घरी मामाला सांगितलं. मग आम्ही पोलिसांकडे गेलो व जे खरे गुन्हेगार आहेत त्यांची नावे सांगितली. मामाच्या घरी येऊन एक महिना झाला तरी आम्हाला विचारायला कोणी आले नाही. परंतु, जेव्हा आम्ही पोलिसांत जाऊन तक्रार केली, त्याच्या दुसर्याच दिवशी गावातील काही पंच 30 जुलै रोजी आमच्या मामाच्या घरी येऊन मिटींग घेऊन हे प्रकरण इथेच मिटवूया, हे आम्हाला सांगायला आले होते. ही केस इथेच संपवा, तुम्ही सुळग्यातील घरी रहा, तुमची जमीन ताब्यात घ्या आणि सगळे मिळून मिसळून रहा, असे सांगायला आले होते. आम्ही मिटींगला येणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला धमकी देखील दिली.
मुलीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे सर्व घडण्याआधी आमचा काका दारू पिऊन येऊन आईच्या अंगावर धावून जात होता, घाण शिव्या देत होता, एप्रिल 2019 मध्ये आई व मामा काकती पोलिसांत तेव्हा तक्रार करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातील पंचांना पोलिसांनी फोन करून तक्रारीची माहिती दिली. तेव्हा भागाण्णा यांनी मी समजावून सांगतो, असे म्हणत तेव्हा फिर्याद नोंद करू दिली नाही. मृत महिलेची मुलगी रेणुका हिने तक्रारीत दोन कारणामुळे आपल्या मम्मीचा खून रपोलिसांत तक्रार दिल्याचा राग होता. शिवाय मुख्य कारण म्हणजे आमच्या मम्मीच्या व माझ्या चारित्र्यावर संशय घेत होते. आमची मम्मी स्वतः शेती करत होती, ते या सर्वांना बघवत नव्हते व माझ्या मम्मीवर भलतेसलते आरोप करत होते. या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे या पत्रात मुलीने म्हटले आहे.
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांना गुरुवारी काकती पोलिसांनी अटक केली. आत्महत्येनंतर तब्बल दोन महिन्यानंतर ही कारवाई झाली. सासरा, सासू, दीर व जाऊ या सर्वांना अटक झाली आहे. महिलेचा खून करुन तिने आत्महत्या केल्याचे भासविल्याच्या आरोपाखाली ही अटक झाली आहे. सर्वांची जिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.