बेळगाव : निवडणूक जवळ आल्यानंतर सगळे लोकप्रतिनिधी आणि इच्छुक कार्यकर्ते मनातल्यामनात म्हणताना दिसत आहेत, उठा उठा निवडणूक आली गिफ्ट वाटण्याची वेळ झाली…
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यास राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये जाऊन भेट वाटप सुरु झाले असून यामध्ये काँग्रेस पुढे असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना (voter) लालूच दाखवणं आता राजकीय पक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं होणार आहे. निवडणूक आयोग निवडणुकीच्या (Election Commission) नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता मतदानापूर्वी मतदारांना मोफतमध्ये जेवण देणं आणि मतदारांना दारू पाजणं गुन्हा ठरणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशासह भेटवस्तू, घरगुती भांडी, साड्या, फ्री कुपन वगैरेंच्या वाटपावर बंदी घातली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा भेट वस्तूंचे वाटप आणि मेजवान्या देणाऱ्यांवर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी 2023 ची विधानसभा निवडणूक आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणूक काळात भेटवस्तूंचे आणि फ्री कुपनचे वाटप म्हणजे मतदारांना लाच देणे आणि त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहोचवणे असे समजले जाईल. असे करणे हा गंभीर गुन्हा असून ते कदापि सहन केले जाणार नाही. सर्व राजकीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी बांधील राहणे अत्यावश्यक असणार आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बाबतीतील लाचखोरीला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात लक्ष ठेवले जात आहे. काळात भेटवस्तू, पैसे, घरगुती भांडी किंवा कपडेलत्ते वाटपावर पूर्णपणे बंदी असेल. तसे कांही करताना आढळल्यास त्या वस्तू जप्त केल्या जातील आणि संबंधित पक्षावर गुन्हा नोंदवला जाईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त मेजवान्या, उत्सव आणि खेळांचे आयोजन केले जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे कुपन किंवा फ्री तिकीट वाटप करण्यास सक्त मनाई असेल. असा प्रकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहे असे समजले जाईल आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसे करण्यास प्रतिबंध केला जाईल. एकंदर आगामी निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक याची खातरजमा करणे हे जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचे देखील कर्तव्य आहे.