बेळगाव-खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एक महिला दोन अस्वलांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे. हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी अचानक हल्ला चढविला.
तिच्या कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा करताच तिचा पती व इतर शेतकरी मदतीला धावून आले व लाठ्या काठ्या व दगडाने मारून अस्वलांना पिटाळून लावत महिलेला अस्वलांच्या तावडीतून बाजूला केले. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या रेणुका हिला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.