काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. 23 नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हे बदल कसे असतील याची उत्सुकता होती. गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नव्या नेत्यांकडे राज्यांचा प्रभार देण्यात आला आहे. तारीक अन्वर यांच्याकडे केरळ, लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक राज्याचा प्रभार देण्यात आला आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे मध्य प्रदेशचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी चा प्रभार काढून घेण्यात आला आहे.
अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी जी सल्लामसलत कमिटी बनवण्यात आली आहे. त्यात सहा जणांच्या कमिटीत मुकुल वासनिक यांना स्थान आहे. या सहा जणांच्या कमिटीत ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ऐवजी एचके पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी झाली आहे. पण पुन्हा एकदा कर्नाटकच्या व्यक्तीकडे महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभार कायम राहणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना संघटनात्मक पातळीवर कुठली मोठी जबाबदारी मिळते का याची उत्सुकता होती. मात्र, नव्या बदलांमध्ये त्यांचं नाव कुठेही दिसत नाही.
राजीव सातव यांच्याकडे महत्त्वाच्या गुजरात राज्याचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. रजनी पाटील यांच्याकडे हिमाचल ऐवजी आता जम्मू-काश्मीरची जबाबदारी असेल. सोनिया गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची देखील पुनर्रचना केली आहे. या कमिटीत शशी थरूरस मनीष तिवारी यांना स्थान मिळू शकले नाही. महाराष्ट्रातून वर्किंग कमिटीत राजीव सातव, मुकुल वासनिक, रजनी पाटील, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले हे सगळे याआधीही वर्किंग कमिटीचे सदस्य होते.