लग्न हे असे बंधन आहे; ज्या बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्तींचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची एकत्र सुरुवात करतात. एकत्र एका छताखाली राहतात, एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांच्या सुख-दु : खात पाठीशी उभे असतात. पण, तुम्ही कधी असे वाचलेय किंवा ऐकलेय का, की एका शहरात राहूनसुद्धा लग्नानंतर नवरा-बायको वेगवेगळ्या घरात राहतात. नोकरी किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे नाही, तर लग्नानंतरही सिंगल राहण्यासाठी वेगवेगळे राहतात. तुम्हाला वाटेल, लग्नानंतर कोणी सिंगल कसे राहू शकते? पण ‘Weekend Marriage’मध्ये हे शक्य आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत …
वीकेंड मॅरेज म्हणजे काय?Weekend Marriage ही एक अशी संकल्पना आहे; ज्यामध्ये लग्नानंतर जोडपे आठवड्यातून एक दिवस त्यांचे नाते निभावतात आणि बाकी दिवस सिंगल म्हणून जगतात. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण हे खरे आहे. यालाच सेपरेशन मॅरेजसुद्धा म्हणतात जे जोडपे वीकेंड मॅरेज करतात, ते आठवड्यातून एकदा त्यांच्या पार्टनरला भेटतात. आठवड्यातील बाकी दिवस ते त्यांच्या कामात व्यग्र असतात. एकमेकांच्या कामात ते हस्तक्षेप करीत नाहीत. असे लोक एका घरात राहूनही वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात; तर काही लोक एका शहरात किंवा सोसायटीत राहूनसुद्धा वेगवेगळे राहतात.
वीकेंड मॅरेजची ही कन्सेप्ट तुम्हाला विचित्र वाटेल. ही पद्धत जपानमध्ये उदयास आली. जपानचे लोक म्हणतात की, लग्नानंतर वैयक्तिक स्पेस संपते आणि त्यामुळे स्वत : ला वेळ देणे शक्य होत नाही. अनेकदा पार्टनरच्या आनंदासाठी ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात आणि स्वत : ला पार्टनरसाठी बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. अशात जपानच्या लोकांनी स्वीकारलेली वीकेंड मॅरेज ही कन्सेप्ट खूप सोईस्कर ठरली आहे. आता जपानसह भारत आणि जगातील अनेक देशांत वीकेंड मॅरेज चांगलेच चर्चेत आहे.
वीकेंड मॅरेजविषयी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो; पण हा कन्सेप्ट त्या लोकांना अधिक फायदेशीर ठरत आहे; ज्यांची जॉब प्रोफाईल ही त्यांच्या पार्टनरपेक्षा वेगळी आहे आणि ज्यांची जॉबची वेळ व ठिकाण वेगवेगळे आहे. असे लोक इच्छा असूनही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत; पण वीकेंड मॅरेजमुळे त्यांना एकमेकांबरोबर आठवड्यातून एक दिवस क्वालिटी टाइम घालवता येऊ शकतो. (टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)