बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश चन्नबसप्पा अंगडी (वय 65) (Belgaum MP and State Railway Minister Suresh Angadi) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्स (AIMS Delhi) दिल्ली येथे उपचार सुरू झाले होते. बुधवारी (23 सप्टेंबर) सायंकाळी 8 च्या दरम्यान Covid-19 मुळे त्यांचा उपचारादरम्यान मृृत्यू झाल. अंगडी यांच्या पच्छात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. मुळेचे के.के. कोप्प (ता. बेळगाव) गावचे अंगडी गेली 16 वर्षे बेळगावचे खासदार होते.
के. के. कोप्प हे बेळगाव तालुक्यातील टेकडीवर वसलेले गाव. तेच मंत्री खासदार अंगडी यांचे जन्मगाव. खडतर स्थितीतूनच अंगडी यांनी बी. कॉम., एलएलबीचे (BCom LLB) शिक्षण घेतले. त्यानंतर बेळगाव भाजप जिल्हाध्यक्ष ते रेल्वे राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा राहिला. त्यांच्या भावंडांना उच्चशिक्षण घेता आले नाही. मात्र, कठीण परिस्थितीवर मात केली म्हणूनच ते यशस्वी राजकारणी होऊ शकले. यशस्वी व्यावसायिक व त्यानंतर प्रसिद्ध राजकारणी म्हणून ख्याती मिळविलेल्या मंत्री सुरेश अंगडी यांची अचानक झालेली 'एक्झिट' केवळ बेळगावच नव्हे, तर कर्नाटक राज्य व देशातील सर्वांसाठीच धक्का आहे.
कोरोना संसर्ग झाल्यापासून अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून ते बरेही झाले, पण, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासाठी मात्र कोरोना (coronavirus) काळ ठरला. कोरोनामुळे निधन झालेले ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले. अत्यंत सरळ व सुस्वभावी राजकारणी म्हणून त्यांनी वेगळी ओळख तयार केली होती.
सुरेश अंगडी यांचा जीवन परिचयजन्म : 1 जून 1955, आई : सोमव्वा, वडील : चन्नबसाप्पा अंगडी
गाव : के. के. कोप्प (ता. जि. बेळगाव)
शिक्षण : कायदा पदवीधर
कौटुंबिक पार्श्वभूमी - पत्नी : मंगला, अपत्ये : दोन मुली
राजकीय कारकीर्द : भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते. 1996 ते 1999 या काळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष
2001 मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष
जिल्हाध्यक्ष असतानाच 2004 मध्ये बेळगाव मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर.
19 जुलै 2016 ते 25 मे 2019 या काळात संसदीय सदन समितीचे अध्यक्ष
2019 मध्ये चौथ्यांदा लोकसभेवर.
30 मे 2019 रेल्वे राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात निवड
2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली. बेळगावचे तत्कालीन खासदार अमरसिंह पाटील यांचा त्यांनी पराभव केला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लाटेत ते खासदार झाले, अशी हेटाळणी त्यांच्या राजकीय विरोधकांनी केली, पण बेळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांना पर्याय नाही हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले. त्यावेळी त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. 2009 मध्ये काँग्रेस पक्षातून अमरसिंह पाटील तर धर्मनिरपेक्ष जनता दलातून माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते. मात्र या तिरंगी लढतीतही त्यांनी सहज विजय मिळवत दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले. 2014 मध्ये विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अंगडी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. परंतु, यावेळीही त्यांनी बाजी मारलीच. 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आली. त्यामुळे अंगडी यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, त्यांचे मंत्रिपद हुकले. 2019 मध्ये अंगडी यांना उमेदवारीही मिळणार नाही, अशी चर्चा असतानाच त्यांनी उमेदवारी तर मिळविलीच. शिवाय विक्रमी मतांनी विजय संपादित केला. यावेळी त्यांची पक्षनिष्ठ फळाला आली अन् त्यांना रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले.
जिल्हाध्यक्ष ते खासदारके. के. कोप्पसारख्या छोट्याशा खेड्यात आव्हानात्मक परिस्थितीत जीवनाची सुरवात करीत त्यांनी व्यवसायात लक्ष घातले. सिमेंट व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. व्यवसायाच्या व्यापातून त्यांनी समाजकार्यावरही भर देऊन लोकसंग्रह वाढविला. बेळगाव परिसरातील प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात अंगडी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या समाजकार्याची व पक्षनिष्ठेची दखल घेऊनच २००४ मध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली होती. सगळ्यांशी असणारे सलोख्याचे संबंध आणि मितभाषी स्वभावामुळे ते अखेरपर्यंत बेळगावचे खासदार राहिले. कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ मंत्री अंगडी हे कन्नड भाषिक असले तरी त्यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवरही उत्तम प्रभुत्व होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने बेळगाव व चिक्कोडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्न केले. गत चार निवडणुकांत भाजपमधून त्यांनी विजय प्राप्त केला. मतदारसंघामध्ये पिण्याचे पाणी, रस्ते आदी माध्यमांतून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगावात केंद्रीय विद्यालय क्रमांक-3 सुरु झाले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा (RCU) दर्जा देण्यासाठी खासदार अंगडी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोलाचे ठरले आहे. आयटी पार्क देसुर, सांबरा विमानतळाचा विकास, बेळगाव रेल्वेस्थानकाला सुविधा या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावले. शैक्षणिक कार्यातही ठसा राजकारण करत असतानाच समाजकार्य, शैक्षणिक कार्य अखंडितपणे सुरू ठेवले. उद्योग क्षेत्रात ठसा उमटवितानाही त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातूनही त्यांनी तळागाळातील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे मंत्री सुरेश अंगडी यांना सामान्यांचा नेता म्हणून ओळखले जात होते.
केंद्रीय आर्थिक व्यवहार सल्ला समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महाविद्यालयाबरोबरच बेळगाव विभागात येणाऱ्या 7 जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची समस्या दूर व्हावी, यासाठी भुतरामहट्टीत राणी चन्नम्मा विद्यापीठ सुरू करण्यात श्री. अंगडी यांनी मोलाची भूमिका बजाविली होती. के. के कोप्पला शिक्षणच नव्हे, तर रस्तेही नव्हते. त्यांनी आधी रस्ते केले, नंतर आई सोमव्वा चन्नबसाप्पा अंगडी यांच्या नावे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय सुरु केले. तेथे आजुबाजूच्या 38 गावांतील मुले शिक्षण घेतात. तत्कालीन भाजप सरकारच्या कालावधीत सुसज्ज असे राणी चन्नम्मा विद्यापीठ सुरु झाले अन् बेळगावची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली. खासदार अंगडी यांनी मंडोळीजवळ अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी ही संस्था सुरू केली. तेथे इंजिनिअरिंग बरोबर एमबीए, एमसीए असे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत.