महाराष्ट्र : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारला आहे. आणि या लढाईत आता मराठा समाजाने पूर्ण ताकदीनिशी जरांगेंच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर ठिकठिकाणी मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करतानाच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करत लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचवेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी खासदारकीवर पाणी सोडत जागेवर राजीनामा लिहून दिला होता. अशातच आता गेवराईचे (बीड) भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराने पहिला राजीनामा दिला होता. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे (पुणे) आमदार अतुल बेनके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान, आता गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देतानाच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर राज्यभरातून मराठा आरक्षणासाठी अक्षरशः वणवा पेटला आहे. मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी त्याचबरोबर काळे झेंडे दाखवणे हा चांदा ते बांदा कार्यक्रम सुरू आहे. राज्यभरामध्ये सकल मराठा समाज त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा, विविध सामाजिक संघटनांकडून आता मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ आवळली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न आता दिवसागणिक राज्यांमध्ये गंभीर होत चालला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहेत. त्यातच गेल्या आठ-दहा दिवसांत अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेतेमंडळींना गावबंदी करण्यात आली. सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर आरक्षणासाठी राज्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनीही पदाचे राजीनामेही दिले.