बेळगाव—belgavkar—belgaum : मणतुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुयारी पुलाचे काम सुरु असल्याने खानापूर-हेम्माडगा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता. त्याच्या अंमलबजावणीला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. हा रस्ता 22 मार्चपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे, स्थानिकांना दुचाकी, चारचाकींसाठी आता असोगा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मिरज-लोंढा रेल्वे लाईनवरील एल. सी. गेट क्र. 356 वर भुयारी पुलाचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून मणतुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुयारी पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी दोन्ही बाजूची रहदारी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. पुलाच्या कामाला रस्त्यावरील रहदारीचा अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनचालकांना आता खानापूरहून थेट हेम्माडगामार्गे गोव्याला जाता येणार नाही.
तथापि, असोगामार्गे जाताना वाटेतील मणतुर्गा तलावाच्या पुलावरील बांधावर अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावरून एकावेळी एकच चारचाकी जाऊ शकेल इतकी जागा आहे. मुख्य रस्ता बंद झाल्याने या मार्गावरुन वाहनांची वर्दळ वाढल्याने सध्या या तलावावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मणतुर्गा ग्राम पंचायत आणि खानापूर पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवून रोज निर्माण होणारी रहदारीची कोंडी दूर करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. रहदारी वळविल्याने सध्या मणतुर्गा वासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक व अवजड वाहनांना असोगा मार्गावरुन बंदी घालण्यात यावी. तसेच अवजड वाहनांना रामनगर अथवा जांबोटीमार्गे जाण्याची सक्ती करण्यात यावी. ईश्वर बोबाटे, काँग्रेस नेते, मणतुर्गा
