बेळगाव—belgavkar : बेळगाव शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करण्याच्या उद्देशानेच या निवडणुकीमध्ये सहभागी झालो आहे. शहराचा सर्वांगीण विकास हे आपले उद्दिष्ट आहे, असे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव शहरामध्ये विविध भागात प्रचार करून ते बोलत होते.
भाजप सत्तेत असूनही अपेक्षित विकास साधलेला नाही. मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असून मतदारांनी जागरुक राहून धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळीही मोदी यांचे नाव सांगून मते मागण्यात आली होती. मात्र, जनतेने आशा-अपेक्षा ठेवून मतदान करुनही त्याचा उपयोग झालेला नाही. तरुणांना रोजगार मिळालेला नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच भाजपच्या धोरणाची दिशा दिसून येते. मतदारांनी यावेळी अशा खोट्या आश्वासनांना बळी न पडता खोटी आश्वासने देणाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे.
बेळगाव शहराला आलेल्या महत्त्वाकांक्षी योजना हुबळी-धारवाडला वळविल्या आहेत. राज्याची दुसरी राजधानी म्हणून बेळगावला दर्जा देण्यात आला असला तरी विकासकामे मात्र हुबळी-धारवाडला नेली जात आहेत. त्यामुळे शहराचा विकास झालेला नाही. हायकोर्ट, आयआयटी कॉलेज बेळगावला येणे अपेक्षित होते. मात्र, ती हुबळी-धारवाडकडे वळविण्यात आली आहेत. याचा जनतेने विचार करावा व त्यांना धडा शिकवावा. आता बेळगाव आपली कर्मभूमी सांगून मते मागितली जात आहेत, याचा मतदारांनी विचार करून मतदान करावे. बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून या निवडणुकीत आपल्याला भरघोस मते देऊन निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. नेहरूनगर, सदाशिवनगर, आंबेडकरनगर, शिवबसवनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी आदी भागामध्ये प्रचार करण्यात आला. विविध संघ-संस्था, कामगार संघटना, महिला, युवा संघटनांच्या बैठका घेऊन प्रचार करण्यात आला