देशात उष्णतेने कहर केला आहे. लोकांना आकाशातून कोणी आग ओकत असल्यासारखा अनुभव येत आहे. दिवसा घराच्या बाहेर निघणं देखील कठीण झालं आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मे महिन्यातील स्थितीचा अंदाज व्यक्त केला असून तो फारसा दिलासादायक नाही. मे महिन्यात देशभरात तापमान चढेच राहील असं सांगण्यात आलं आहे. (Weather Updates IMD)
आएमडीने बुधवारी इशारा जारी केला आहे. उत्तर भारतातील लोकांना भट्टीमध्ये असल्यासारखा अनुभव येणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात मे महिन्यामध्ये तापमान साधारणपेक्षा अधिक राहील. विशेषत : पुढील चार दिवस तापमान जास्त असणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात देखील उष्णतेची लाट येणार आहे. आयएमडी प्रमुख मृत्यूजंय महापात्र यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 5 ते 8 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान साधारणपेक्षा जास्तच असणार आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत तापमान जास्त राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयएमडी प्रमुखांनी सांगितलं की, मे महिन्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारतातील अनेक भाग, मध्य भारताचे काही भाग, नॉर्थ ईस्ट भारतात पासवाची स्थिती सामान्य ते जास्त असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्ये देखील अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. येथे सामान्य ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.