बेळगाव—belgavkar : दहा वर्षांपूर्वी विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. केवळ सत्तेसाठी मोदी हे काम करत आहेत. भाजपविरोधातील सरकार असलेल्या राज्यांना द्वेषाची भावना ठेवून काम करत आहे. कर्नाटकवर मोदी यांचा विशेष राग असल्यासारखे वागत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी केला.
चिकोडी येथील आर. डी. हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी आयोजित चिक्कोडी लोकसभा (Chikkodi Lok Sabha) मतदारसंघाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी (Priyanka Jarkiholi) यांच्यासाठी प्रचारसभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान मोदी हे दहा वर्षांपासून देशाची फसवणूक करत आहेत. ₹ 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणे, वर्षाला दोन कोटी रोजगार देणे, महागाई कमी करणे, काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले होते. इंधनाचे दरही भडकले आहेत.
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, कर्नाटकात आम्ही सत्तेवर आल्यावर पंचहमी योजनेद्वारे शंभर दिवसांत सर्व आश्वासने पूर्ण केली. आता केंद्रातील काँग्रेस नेत्यांनीही 25 गॅरंटी दिली आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसला मतदान करणे आवश्यक आहे. कर्नाटकात यापूर्वी भाजप सरकारने काहीही केले नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. म्हणून आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. राज्यात बसवण्णा यांना सांस्कृतिक नेता जाहीर केले आहे.
कर्नाटक हे देशात सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला देण्यास विरोध करून सुड भावनेचे काम करत असलेल्या मोदी सरकारला धडा शिकवा. राज्यातील 25 पैकी एकाही खासदाराने याबाबत आवाज उठविला नसल्याने एकाही भाजपच्या खासदारास मते देऊ नका. काँग्रेसच्या प्रियंका सतीश जारकीहोळी यांना साथ द्या. संसदेत तरूण आवाजाला संधी द्या.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, के. एच. मुनियप्पा, महेंद्र तम्मनावर, काकासाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मंत्री एम. सी. सुधाकर, मंत्री डी. सुधाकर, आमदार गणेश हुक्केरी, राजू कागे, ए. बी. पाटील, शाम घाटगे, वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.