बेळगाव—belgavkar : कर्नाटक राज्य सरकारकडून राबविलेल्या 5 गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. तर या निवडणुकीत या योजनांचा प्रभाव मतदारांवर झाला असून राज्यात काँग्रेसला पुरक वातावरण आहे. भाजपकडून तांदूळ वितरणात राजकारण केल्याने नागरिकांना तांदळाऐवजी पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. मुनीयप्पा यांनी केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पुढे ते म्हणाले, राज्यामध्ये काँग्रेसला पुरक वातावरण आहे. त्यामुळे अधिक जागा जिंकण्याचा विश्वास आहे. दिलेले वचन पाळल्याने बोले तैसा चाले हे दाखवून दिले आहे. जनतेला तांदूळ वाटण्याचा विचार राज्य सरकारने केला होता. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी तांदळाचा साठा असल्याचे सांगितले होते. मात्र केंद्र सरकारने यामध्ये राजकारण केले आहे. यामुळे राज्यातील जनतेला तांदळाऐवजी पैसे दिले जात आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी जोरदार प्रचार करून मतदारांना काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून जनहिताच्या योजना राबविल्या जात असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे कल्याण साधले जात आहे. गरिबांच्या कल्याणासाठी गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या असून मतदारांनी मृणाल हेब्बाळकरांना विजयी करावे, असे आवाहन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी येथे केले.