Jammu : काल, म्हणजेच 9 जून रोजी एकीकडे राजधानी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या रियासी भागात माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला, तर 40 लोक जखमी झाले. या घटनेनंतर मोदी सरकारमधील मंत्र्याने मोठे वक्तव्ये केले आहे.
या दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझा विश्वास आहे की जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार बनवत असल्याने भीती निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक हा हल्ला करण्यात आला, पण अशा घटना घडत राहिल्या तर आपल्याला पाकिस्तानशी युद्ध सुरू करावे लागेल. अनेक दहशतवादी पीओकेमधून भारतात येतात, त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्या ताब्यात घ्यावे लागेल.
जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये शिवखोडी धाम दर्शनासह माता वैष्णोदेवीला गेलेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल दरीत कोसळली. या घटनेत चालकासह 10 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 40+ भाविक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹ 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ₹ 50000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.