बेळगाव—belgavkar : लोकसभा मतदारसंघात भाजप आणि म. ए. समितीने एकत्र काम केल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याचे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. केशिवकुमार यांची भेट घेऊन निवडणुकीची माहिती दिल्यानंतर येथे सोमवारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगावमध्ये गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस, भाजप आणि म. ए. समिती यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मात्र, यावेळी तसे झाले नाही. विधानसभेचे वातावरण वेगळे आणि लोकसभा निवडणुकीचे वातावरण वेगळे असते.... निवडणुकीच्या गणिताबद्दल बोलायचे तर प्रत्येक मतदारसंघाचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र, बेळगावात काँग्रेसच्या विजयासाठी सुरुवातीपासूनच चांगले वातावरण होते. जाहीर पाठिंबाही होता. असे असतानाही आम्हाला अपयश आले.
कर्नाटकात काँग्रेसला जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. मात्र, कोणत्याही कारणास्तव हमी योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकांच्या सक्षमीकरणासाठी हमी योजना राबविण्यात आल्या आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी आणि अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यातील वादाबाबात विचारले असता दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून वाद मिटवावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.