बेळगाव—belgavkar : राजापूर | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र : मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळनजीकच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर उलटून सुमारे 30 फूट दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये डंपरचालक विष्णू शिवाप्पा पामर (वय 28, रा. वैभवनगर, बेळगाव, कर्नाटक) हा जागीच ठार झाला आहे. डंपरचालकाच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. त्याचा कंबरेखालील भाग डंपरमध्ये अडकला होता, तर धड वेगळे झाले होते. अपघातानंतर डंपरच्या केबिन आणि ट्रॉलीचे दोन भाग होऊन केबिन जळून खाक झाली. यात डंपरचालकाच्या शरीराचा काही भाग जळून गेला होता. बुधवारी दुपारी 12.30 ते 1 वा. च्या दरम्यान हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजराम चव्हाण यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली. चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, राजापूर पालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पेट घेतलेला डंपर विझविण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.
ओणीकडून विलवडेकडे वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाळू भरलेला डंपरनजीकच्या 30 फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये डंपरचालक जागीच ठार झाला. अपघात झालेल्या डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याने वाटूळ उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचेही बोलले जात आहे. त्यात चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे ओणी ते विलवडेदरम्यान ओव्हरलोड वाळू वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. वाटूळ येथे झालेल्या अपघाताने वाळू वाहतुकीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. ओणी मंदरुळ येथून खाणीतून ही वाळू वॉशिंगसाठी प्लँटवर नेली जाते. यासाठी योग्य ते परवाने घेणे आवश्यक असताना ते घेतले जात नसल्याचे बोलले जात आहे, तर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळूचा भरणा करून बेधडकपणे दिवसरात्र वाहतूक केली जाते. त्याकडे महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात असून, महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे