बेळगाव—belgavkar—belgaum : एकीकडे झाडे लावा, झाडे वाचवा पाणी जिरवा अशा अनेक योजना सरकारकडून व पर्यावरण प्रेमी कडून सतत राबविल्या जातात, तर दुसरीकडे हमखास झाडे तोडून व पाण्याचा अतिरेक करून निसर्गाची हानी करण्यात काही लोक मग्न असतात, त्यामुळे निसर्गाचे रक्षण होण्यापेक्षा निसर्गाची हाणिच माणसाकडून जास्त होत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व यावर्षीचा उन्हाळा एकदम तीव्र स्वरूपाचा असल्याने लोकांना दिवसा घराबाहेर पडणे मुश्किलीचे झाले आहे, त्यामुळे बेळगाव ग्रामीणच्या आमदार तर कर्नाटक राज्याच्या मंत्री सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सुशोभित झालेल्या राजहंसगड किल्ल्यावरती दररोज हजारो पर्यटक भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटत असतात, त्यामुळे बेळगाव व परिसरातील जनतेला व पर्यावरण प्रेमींना जवळच असलेल्या निसर्ग संपन्न राजहंसगड किल्ल्यावरती कडक उन्हात झुळझुळणाऱ्या थंडगार वाऱ्यात फिरण्याचा मोह काही आवरेना. पण शनिवारी काही अज्ञात व्यक्तींनी राजाहंसगडाच्या पायथ्याशी असलेल्या यरमाळी राजहंसगड रस्त्याच्या शेजारून कोणीतरी आग लावली.
दुपारी बाराच्या दरम्यान भरती उन्हात लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले व ही आग हळू हळू यरमळी गावापासून राजहंसगड किल्ल्याच्या दिशेने सरकत सरकत किल्ल्यात आग येऊन पोहोचली. आगीबरोबर सोसाट्याचा वाराही आल्याने क्षणार्धात आगीने तेथे असलेल्या खेळणी विक्रेत्यांच्या 4 दुकानांना आगीने घेरले त्यामुळे कडक उन्हाची तीव्रता व गडावरती पाण्याची कमतरता यामुळे आग विझवणे मुश्किल झाल्याने तेथे उपस्थित असलेल्या पर्यटक व पोलिसांनी बेळगाव अग्निशामक दल व पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क करून पाण्याचा बंब मागून घेतला. पण तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकाने व किल्ला परिसरातील सुशोभित गार्डन झाडे, इलेक्ट्रिक केबल व इतरही साहित्य आगीत भस्मसात झाले.
आगीची तीव्रता इतकी होती की त्या ठिकाणी धुळाचे लोट व आग आणि सोसाट्याचा वारा पाहून गडावरती उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या लहान मुलांनी किंचाळा फोडला त्यामुळे काही वेळेपुरता राजहंसगडावरील वातावरण भरदिवसा भयभीत झाले होते. या आगीच्या घटनेमुळे खाजगी खेळणी विक्रेत्या बरोबरच सरकारी मालमत्तेचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पाण्याच्या बंबासह अग्निशामक दलाच्या जवानांनी व पोलिसांनी पाण्याचा मारा करून पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला.
गडावरती जर पाण्याचा साठा उपलब्ध राहिला असता तर निदान खेळणी विक्रेत्यांची दुकाने या आगीत जळण्यापासून बचावली असती असे तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकातून बोलले जात होते. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी सरकारने या ठिकाणी पाणी व इतरही जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे.