देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे देशाताल रिकव्हरी रेट 90% आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढत असला तरी केरळपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.
देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. 'गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली. सध्याच्या घडीला काही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं पॉल यांनी सांगितलं. केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह ३-४ केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं पॉल म्हणाले. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र संकट अद्याप कायम आहे,' असं पॉल म्हणाले. हिवाळ्याच्या दिवसांत देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न विचारला असता पॉल यांनी युरोपमधील परिस्थितीचा संदर्भ दिला. 'हिवाळा सुरू होताच युरोपमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढू शकतो,' असं पॉल यांनी म्हटलं.
'देशात कोरोनाची दुसरी लाट येणारच नाही, असं म्हणता येणार नाही. हिवाळा सुरू होताच उत्तरेकडील राज्यांमधील प्रदूषण वाढतं. त्यातच आता देशात सण उत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. पुढील काही महिने आव्हानात्मक आहेत. त्यामुळे काळजी न घेतल्यास आतापर्यंत कमावलेल्या गोष्टी गमावण्याची वेळ येईल,' अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली.
देशात कोरोना वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 78 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 70 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 50 हजार 129 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 78 लाख 64 हजार 811 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 6 लाख 68 हजार 154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 17 हजार 956 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 70 लाख 78 हजार 123 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.