बेळगाव : निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31, सध्या रा. अंजनेयनगर, बेळगाव, मूळचा राहणार उदगीर, जि. लातूर) या युवकाचा 26 नोव्हेंबर रोजी मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील गोकाक-कबलापूर रोडवर खनगाव गावाजवळ खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. निशिकांतचे कुटुंबीय लातूर जिल्ह्यातील उदगीरचे. नोकरीनिमित्त गेल्या अडीच ते तीन वर्षांपूर्वी तो बेळगावात आला होता. गळा चिरून त्याचा खून कोणी केला...? याचा उलगडा झाला नाही. एक दिवस आधी 25 नोव्हेंबर रोजी त्याचे अपहरण झाले होते. खासगी कंपनीत नोकरी करणार्या या युवकाच्या खुनाला 5 दिवस उलटले तरी अद्याप त्याचे मारेकरी सापडले नाहीत. पोलीस दलासमोर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
अपहरणानंतर त्या युवकाच्या मोबाईलमधून 7 ते 8 जणांना मेसेज पाठविण्यात आला आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे. निशिकांत एका कृषीसंबंधित कंपनीत प्रमुख पदावर नोकरी करीत होता. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याला एक कॉल आला. त्यानंतर निशिकांत आपल्या घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही. दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. रात्री तो घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी माळमारुती पोलीस स्थानक गाठले. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. निशिकांतच्या खुनाचे अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. अपहरणानंतर मारेकर्यांनी त्याला कणबर्गीजवळ नेले आहे. त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या पत्नीसह 7 ते 8 जणांना मेसेज करण्यात आला आहे. ‘माझे अपहरण झाले आहे. हे लोक माझा खून करतील’ असा उल्लेख आहे. या मेसेजमध्ये दोघा जणांची नावेही उल्लेखिण्यात आली आहेत.
मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या नावांवरून मारिहाळ पोलिसांनी दोघा जणांची चौकशी केली आहे. मात्र, त्यांच्याकडून मारेकर्यांचा शोध होईल, अशी कसलीच माहिती उपलब्ध झाली नाही. तपासाची दिशा बदलण्यासाठी मारेकर्यांनीच त्याच्याच मोबाईलमधून त्याचे नातेवाईक व मित्रांना मेसेज केले आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे. प्रत्येकाला पाठविलेल्या मेसेजमध्ये ‘सर’ असा उल्लेख आहे. निशिकांत ज्या कंपनीत काम करीत होता त्याच्या हाताखाली काम करणार्या कर्मचार्यांना गेलेल्या मेसेजमध्येही ‘सर’ असाच उल्लेख आहे. यावरून तपासाची दिशा चुकविण्यासाठी मारेकर्यांनी मेसेज पाठविण्याची शक्कल लढविल्याचा संशय आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर सध्या या प्रकरणी तपास करीत आहेत.