बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावात युवक मंडळाच्या फलका समोर फडकावला भगवा ध्वज. शिवसेना नेते विजय देवणे आणि संजय पोवार यांना बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश बजावण्यात आला होता. शिवसेना नेत्यांनी गनिमी काव्याने बेळगावात प्रवेश केला आहे. यावेळी गडहिंग्लजचे सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर आदी उपस्थित होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाही देण्यात आल्या.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून मोर्चा रद्द, पण शिवसैनिकांनी गनिमी काव्याने भगवा फडकावलाबेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररित्या फडकविण्यात आलेला लाल पिवळा ध्वज काढण्यासाठी मराठी भाषिकांनी घेतलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पावित्र्याने कर्नाटक प्रशासन ताळ्यावर आले. यासंदर्भात झालेल्या बैठकीत बेळगांव जिल्हा प्रशासनाच्या विनंती नुसार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आजचा नियोजित मोर्चा रद्द केला. दरम्यान, यासंदर्भात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांच्याशी चर्चा करून लाल पिवळा ध्वज हटविण्याबाबत त्वरित निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्वानीचा इशारा देण्यात आला. तर येत्या काही दिवसात निर्णय घेऊन योग्य कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी याबाबत माहिती दिली.
काही कन्नडिगांनी केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव महानगरपालिके समोर कर्नाटक सरकारचा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज फडकवला आहे. मराठी भाषिकांनी लोकशाही मार्गाने निवेदनाद्वारे यावर आक्षेप घेऊन सुद्धा कर्नाटक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने अखेर समिती आणि शिवसेनेच्या वतीने आज हा लाल पिवळा ध्वज हटविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. महाराष्ट्रातूनही हजारो शिवसैनिक मोर्चात सहभागी होणार असल्याने वातावरण तंग बनले होते. त्यामुळे सीमाभागात मराठी भाषिकांना दडपणाखाली ठेवणा-या बेळगाव प्रशासनाला मराठी भाषिकांसोबत बैठक घेणे भाग पडले.
आज झालेल्या बैठकीत बेळगाव महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याचा यापूर्वीच ठराव झाला असताना याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. पण कर्नाटक राज्याचा म्हणून ज्या लाल-पिवळा ध्वजाची मान्यता न्यायालयानेही फेटाळली तो बेकायदेशीर ध्वज फडकविण्यास प्रशासनाने परवानगी कशी दिली? असा सवाल करत मराठी भाषिकांनी यांचे पुरावेच सादर करुन प्रशासनाला धारेवर धरले. समिती, शिवसेना आणि युवा समितीने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनासमोर पेचप्रसंग उभा राहिला. पण आगामी प्रजासत्ताक दिन आदी सुरक्षेचे कारण पुढे करून, याबाबत येत्या 27 जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देत तूर्तास मोर्चा रद्द करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे सध्या पोलीस प्रशासना वरील वाढता ताण आणि ग्रामपंचायत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आजचा नियोजित मोर्चा तुर्त रद्द केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा एकदा यासंदर्भात निवेदन देणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.