उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील तांडा भागात एक धक्कादायक प्रकरण समोर आलेय, ज्याने सर्वांनाच धक्का बसलाय. येथे मुलीच्या लग्नासाठी पंचायत बसली आणि पंचांना चिठ्ठी टाकून निर्णय घ्यावा लागला. ही मुलगी चार मुलांबरोबर पळून गेली होती, पण मुलगी स्वत: च ठरवू शकली नाही की तिला कोणत्या मुलासोबत लग्न करायचं आहे. कोण जास्त आवडतो किंवा कोणाशी लग्न करावे, याबाबत ती मुलगीच संभ्रमात होती.
पंचांनी चिठ्ठी टाकून घेतला निर्णय : कोतवाली टांडाच्या अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पंचांनी चिठ्ठी टाकून नवरदेवाची निवड केलीय. पाच दिवसांपूर्वी या चारही तरुणांनी या मुलीला घराबाहेर नेले. आरोपींनी त्या मुलीला दोन दिवस नातेवाईकांकडे लपवून ठेवले, परंतु ते तपासात उघडे पडले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली, पण पंचायतीने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जेव्हा मुलीला विचारण्यात आले, तेव्हा ती आपला जीवनसाथी कोणाला निवडायचं हे ठरवू शकली नाही.
तरुणही लग्नासाठी तयार नव्हते : मुलीला पळवून नेणारे कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. या प्रकरणात कोणताही तोडगा न निघाल्यानंतर पंचांनी बंद खोलीत तीन दिवस चर्चा केली. आता काय करता येईल याचा पंचांनी विचार केला. बऱ्याच विचारविनिमयानंतर पंचायतीने निर्णय घेतला की, आता मुलीशी कोण लग्न करेल याचा निर्णय फक्त एक चिठ्ठी टाकूनच घेता येईल.
असा झाला निर्णय : यानंतर चारही तरुणांच्या नावाची चिठ्ठी टाकण्यात आली आणि त्यातून पुढे आलेल्या नावाच्या मुलाशी त्या तरुणीला लग्न करावे लागले. पंचांनी चार चिठ्ठींवर चार तरुणांची नावे लिहिल्यानंतर त्यांना कटोऱ्यात ठेवले. या दरम्यान, पंचांनी एका लहान मुलाला चिठ्ठी उचलण्यास सांगितले. तीन दिवसांपासून सुरू असलेला हा वाद लहानग्यानं चिठ्ठी उचलल्याने मिटला. मुलीचे लग्न ठरले, त्याच मुलाशी ज्याचे नाव चिठ्ठीत होते.